Wednesday, February 26, 2014

उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला

उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला
    
       भूवैकुंठ पंढरीत बडवे उत्पातांचे हक्क संपुष्टात आल्यानंतर आता भुपाळी, काकडआरती, अभिषेक, अलंकारमहापूजा, धुपारती, नैवद्य, शेजारती इ. षोडशोपचारांवरही अनिर्बंध शासनाचे काटेकोर निर्बंध येणार यात नवल नाही. निधर्मी लोकशाही पद्धतीचे हे एक बरे असते. कुणीही यावे, काहीही मागावे आणि धर्मनिरपेक्ष मायबापसरकारने ते हवे तशा कायद्यात बसवून सोयीस्करपणे मान्यही करावे. मग या बेबंदशाहीस महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठोबाने बळी पडावे; याचेही आश्चर्य वाटावयास नको.  नाही तरी विठ्ठलासारख्या गोरगरिबांच्या देवाच्या वाट्यास हे यायचेच. बा पांडुरंगा, आता स्वार्थासाठी गरिबी श्रीमंतीच्या फुटपट्ट्या देवाला लावायलाही मागेपुढे न पाहणाऱ्या अभक्तांसाठी फार वेळ होण्यापूर्वी तरी एकदा डोळे उघडून बघशील का..? उठ पंढरीच्या राजा..!!


     अठ्ठावीस युगांपासून कटेवर हात ठेवून विटेवर उभे असलेल्या विठोबास आणखी काय काय सुखसोहळे पाहावे लागणार आहेत हे एक तो स्वतःच जाणे..सुरवातीला पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर त्याला आजवर ताटकळत ठेवले, मग परकीय आक्रमणांनी त्याला साळो की पळो करून सोडले, त्यानंतर मंदिरप्रवेशासाठी धरणे धरणाऱ्या मानवतेच्या पुजाऱ्यांनी त्याला जंजरपट करून सोडले, फावल्या वेळात बडवे-उत्पातांनी छळले आणि आता  त्यांच्या जाचातून मुक्त होतो न होतो; तोच गोरगरिबांच्या देवाला अलंकार पूजा कशासाठी..? म्हणून शासनास वेठीस धरणाऱ्या तथाकथित संघटनांनी त्याचे उरले सुरले उपचार बंद पडण्याचा खटाटोप चालविला आहे.
     वास्तविक पुरोगामी म्हणविणाऱ्या या संघटनांचा आणि विठोबाचा संबंध येतोच तो फक्त स्वार्थ साधण्यासाठी..! नसता मानवनिर्मित गरिबी-श्रीमंतीच्या फुटपट्ट्या लावून पंढरीचा विठोबा हा फक्त गोरगरिबांचा व कष्टऱ्यांचाच देव आहे असा जावाईशोध लावण्याचा रिकामा उपद्व्याप करणारे महाभाग अभावानेच गवसायचे !! जर तसे असेल तर श्रीमंत व अतिश्रीमंतांचा देव कोणता हे कुणी ठरवायचे ? पांडुरंगास रेशमी वस्त्र नेसाविल्याने किंवा सोन्या चांदीचे अलंकार घातल्याने ती ठराविक वर्गाची मक्तेदारी ठरून त्यास काठी, घोंगडी असा पोशाख द्यावा; अशी कुठल्याश्या ‘मुक्ती दलाची’ मागणी ही देवाला एका माक्तेदारीतून दुसऱ्या मक्तेदारीत ढकलण्याची नसती उठाठेव ठरत नाही का ? आणि गरीबांचा देव असला तरी गरिबास उंची वस्त्रे, अलंकार, खाद्ये आवडत नाहीत का ? जर असतील तर मग ‘यथा देहे तथा देवे’ या सूत्रानुसार जर षोडशोपचारांनी देवाची पूजा बांधली तर बिघडले कुठे..?
     आणि हो..म्हणे ‘विठोबास वस्रे नेसवितांना होणारे पुरुषसुक्त पठण बंद करा !!’ का तर ते पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक असून २१व्या शतकात जगत असतांना त्याद्वारे पुरुषप्रधानसंस्कृती रुजविली जाते. ही मागणी करण्या महाशयांच्या बुद्धीचे तर कौतुक करावे तेवढे थोडेच..वेदोक्त पुरुषसुक्तात ज्याचे वर्णन आले आहे; ती एक अतिभव्य ईश्वरी संकल्पना असून जाती-लिंगभेदातीत आहे; याची सामान्य कल्पनाही नसतांना केवळ शासननियुक्त कर्मचाऱ्यांना ‘संस्कृत-पठन’ येत नाही; म्हणून अकलेचे दिवाळे काढीत विठ्ठलाचा नित्योपचार बंद पडण्याचे महत्पाप करण्याची दुर्बुद्धी त्यांना व्हावी हेही दुर्दैवीच म्हणावे लागेल.

    भूवैकुंठ पंढरीत बडवे उत्पातांचे हक्क संपुष्टात आल्यानंतर आता भुपाळी, काकडआरती, अभिषेक, अलंकारमहापूजा, धुपारती, नैवद्य, शेजारती इ. षोडशोपचारांवरही अनिर्बंध शासनाचे काटेकोर निर्बंध येणार यात नवल नाही. निधर्मी लोकशाही पद्धतीचे हे एक बरे असते. कुणीही यावे, काहीही मागावे आणि धर्मनिरपेक्ष मायबापसरकारने ते हवे तशा कायद्यात बसवून सोयीस्करपणे मान्यही करावे. मग या बेबंदशाहीस महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठोबाने बळी पडावे; याचेही आश्चर्य वाटावयास नको. नाही तरी विठ्ठलासारख्या गोरगरिबांच्या देवाच्या वाट्यास हे यायचेच. म्हणूनच म्हणावेसे वाटते; “बा पांडुरंगा, आता स्वार्थासाठी गरिबी श्रीमंतीच्या फुटपट्ट्या देवाला लावायलाही मागेपुढे न पाहणाऱ्या अभक्तांसाठी तरी, फार वेळ होण्यापूर्वी  एकदा डोळे उघडून बघशील का..?

Saturday, August 24, 2013

डोईचा पदर आला खांद्यावरी..



डोईचा पदर आला खांद्यावरी..

     बदलत्या काळानुसार दाराला उंबरठा राहिला नाही, घराला आंगण राहिलं नाही, गावाला वेस राहिली नाही, विसाव्या शतकात स्त्रीच्या डोईवरून दुहेरी खांद्यावर आलेला पदर हळूहळू एकेरीवर आला आणि कालौघात दिसेनासा झाला. या दुर्दैवी बदलांमुळे झालेले दुःखद परिणाम आपण आज अगदी दिल्ली ते गल्ली व्हाया मुंबई भोगत आहोत. जे जे पुरुष करतो ते ते स्त्रीने केले पाहिजे व हे तिने सदैव सिद्ध करत राहिले पाहिजे अशाप्रकारच्या अट्टहासालाच जर आपण समता म्हणत असू तर उद्याचालून आपणास याहीपेक्षा भीषण प्रकारांना सामोरे जावे लागेल.


 काही दिवसांपूर्वी स्त्रियांवरील अत्याचारांनी दिल्ली हादरली. कालपरवा मुंबईतही तेच घडले. कमीअधिक प्रमाणात देशात अन्यत्रही बलात्काराचे प्रकार चालूच आहेत. अशी घटना घडली की काही काळ तिचे तीव्र (?) पडसाद उमटतात, जनमत संतापते, सरकार अडचणीत येते, माध्यमे ब्रेकिंग न्यूज म्हणून काथ्याकुट करतात, आरोपी पकडले जातात व कालांतराने सुटतातही पण असले प्रकार वारंवार का घडतात याचा विचर करायला आजच्या धावत्या जगात कुणालाच वेळ नसतो. ही घटना जोपर्यंत समाजात घडत असते तोपर्यंत देशातील सुजाण नागरिकांसाठी ती केवळ एक ‘बातमी’ असते, मग आगदी तो ती बातमी जगासमोर आणणारा बातमीदार असला तरीही..!! परंतु मुंबईतील एका   प्रसारमध्यमाच्या २३ वर्षीय महिला छायाचित्रकारावरील अत्याचाराची घटना तीच गोष्ट जर जीवावर बेतली तर काय कठोर अनुभव येतो याचे प्रतिनिधित्व करते व विचार करण्यास भाग पडते.

       म्हणूनच एकविसाव्या शतकात स्त्रीपुरुष समानतेचा डांगोरा पिटणाऱ्या कोतवालांनी त्यांच्या हटवादीपणाचा पुनर्विचार करण्याची आता खरी वेळ आली आहे. जे जे पुरुष करतो ते ते स्त्रीने केले पाहिजे व हे तिने सदैव सिद्ध करत राहिले पाहिजे अशाप्रकारच्या अट्टहासालाच समता मानण्याची विकृत प्रवृत्ती बळावत चालली आहे. केवळ पुरुषाशी स्पर्धा म्हणून जर आजची स्त्री घराबाहेर पडत असेल व आम्ही त्याला समता म्हणत असू तर उद्याचालून आपणांस याहीपेक्षा भीषण प्रकारांना सामोरे जावे लागेल. आज स्त्रीमन, स्त्रीशिक्षण व  स्त्रीजीवनाच्या बाबतीत इतर क्षेत्रांप्रमाणे विलक्षण ओढून नेणाऱ्या प्रवाहाकडे पाहणे अशक्य झाल्याने आपण डोळे मिटून वाहवले जात आहोत. कदाचित गाडीने रूळ बदले असतील पण तिचा खडखडाट अद्यापही थांबलेला नाही हे बलात्कारासारख्या बीभत्स प्रकारांवरून सिद्ध होत आहे. बुद्धीच्या बाबतीत स्त्री पुरुषाची बरोबरी कारीलही, पण तिच्या भावना पुरुषांपेक्षा थोड्या निराळ्या आहेत. निसर्गानेच तिला तशी घडविली आहे. आजच्या यंत्रयुगात स्त्रीला स्वावलंबी होणे पूर्वीपेक्षा जास्त शक्य झाले असले तरी केवळ स्वावलंबनाने तिचे जीवन पूर्ण होवू शकत नाही. पुरुष पराक्रमावर दीर्घकाळ संतुष्ट राहू शकतो पण स्त्रीमन केवळ पराक्रमावर व स्वातंत्र्यावर  समाधानी असूच  शकत नाही.  स्त्रीला स्वातंत्र्याहूनही प्रीती व वात्सल्याचे अधिक आकर्षण असते. यात तिचा कमीपणा मुळीच नाही असला तर मोठेपणाच आहे.

          स्त्रीजीवनाची ही सारी जडनघडण लक्षात घेवूनच भारतीय संस्कृतीने स्त्रीच्या जीवनाला काही मर्यादा आखून दिल्या आहेत. पण पाश्चत्य संस्कृतीच्या झगमगाटात मिरवण्याच्या स्त्रीहट्टापायी तिने त्या आततायीपणाने कधीच ओलांडल्या आहेत. ती आज निसर्गाच्या अनेक बंधनातून निसर्गतःच मुक्त असणाऱ्या पुरुषाची अगदी व्यवसायापासून व्यसनाधीनतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात बरोबरी करू पाहते आहे. फक्त पुरुषासारखी वेशभूषा व केशभूषा करूनच समानता साधते असे तिचे मत असावे. या स्वैराचारामुळे आपण आपले स्वत्व स्त्रीत्व आणि अस्तित्व गमावीत आहोत याचे तिला भान उरलेले नाही. म्हणूनच तिला “Lady, you are not a man..!” असे सांगण्याची वेळ अपूर्वा पुरोहित नावाच्या लेखिकेवर आली असावी.

आज स्त्री स्वतंत्र आहे. तिला स्वतंत्र कायद्यांचे पाठबळ आहे. असे असूनही ती असुरक्षित आहे. तिला संविधानाने समता दिली असेलही पण संस्कृतीने तिला दिलेली सुरक्षा व सन्मान ही विलक्षण मुल्ये आजची स्त्री गमावून बसली आहे. कारण “पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने” असं म्हणणारा व “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” असं म्हणून पुरुष हा जर परमेश्वराची कीर्ती असेल तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे हे सांगणारा मनू आम्हाला सनातनी वाटतो. आम्हाला साडीचा पदर डोईजड होतों व तोंड लपवून नको ते करायला साथ देणारा स्कार्फ  मॉडर्न वाटतो. सौभाग्याचं लेणं असलेलं ठसठशीत कुंकू नको वाटतं व मॅचींगची हिरवी किंवा निळी टिकली फॅशनेबल वाटते. पंजाबी सलवार कमीज रुऽऽड वाटतो आणि स्लीवलेस टॉप आणि तंग जीन्स घालून  मोकाट हुंदडायला जास्त आवडते.

नदी जोवर तिचा काठ ओलांडत नाही तोवर शांत व वंदानियच असते, परंतु तिने मर्यादा ओलांडली की तिचे स्वरूप बदलत असले तरी त्याला ‘पूर’ म्हणतात समुद्र नव्हे. शिवाय पुरामुळे होणारे नुकसान पुढेमागे भरून काढता येते पण समाजच नसला तर हाती काहीच शिल्लक उरत नाही. समईत वातीच्या रूपाने तेवणारी मंद ज्योत ही आगच खरी, ती देवघरात असेपर्यंत शांत प्रकाश देते;  पण तिनेच जर  मशालीचे रूप घेतले तर मग असा कालपरवासारखा भडका उडतो. तो विझवायला केवळ  कायदे समर्थ ठरत नसतात. तपास काढत खूप मागे जावे लागते. तेंव्हा कुठे  गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, सुकन्या, अनसूया, मुक्ताई, जनाई, मीरा, सखू, कान्होपात्रा, सोयराई, वेणाक्का, जिजाऊ, अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई, पंडिता रमाबाई, सावत्री, आनंदी इत्यादींपासून आगदी अलीकडच्या सिंधुताई, अपर्णाताई  यांचे कुळगोत्र सापडते. त्यांच्यात ममताळू माता, प्रेमळ पत्नी, राजस राणी, कणखर कन्या, बळकट बहिण, संयमी सासू आणि सोशिक सून हे स्त्रीजीवानाला कृतार्थ करणारे सप्तरंग सापडतात. मग त्या रंगातला एखादा रंग जरी  पुसटसा वेचता आला  तर ‘चार दिवस सासूचे’ संपतात, ‘मला सासू हवी’ म्हणत दाराबाहेर पडलेलं ‘पुढचं पाऊल’ मागे येतं,  ‘या गोजिरवाण्या घरात - उंच माझा झोका’ म्हणत ‘अवघाची हा संसार’ सुखाचा होतो आणि  स्त्रीजन्माचं खरखुरं सार्थक होतं..

Wednesday, August 14, 2013

आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत काय..?


आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत काय..?
येत्या चोवीस तासात भरपूर जणांचे देशप्रेम उफाळून येणार आहे..आपण भारतीय असल्यची आठवण काही तासंपुरती का होईना प्रत्येकाला होणार आहे..सुमारे सहासष्ट वर्षांपूर्वी  आपला देश परकीयांचे पारतंत्र्य भोगीत होता. सत्तेचाळीस साल उजाडलं व भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक विचार मनास चटकन शिवून गेला , की आपण आज खरोखरच स्वतंत्र झालो आहोत काय..? आणि दुसाऱ्या क्षणी मनाने ताबडतोप उत्तर दिलं,  “बा भारतीया, तू इंग्रजांच्या भौतिक स्वातंत्र्यातून स्वतंत्र झाला असशीलही पण आजही त्यांच्याच वैचारिक पारतंत्र्यात वावरतो आहेस.यात तुझी चूक मुळीच नाही. आज तुला ता गोष्टीचा फारच पश्चात्ताप वाटत असेल तर हा विषमज्वरही तुला फार उशिरा आल्यामुळे त्याचा काही एक उपयोग नाही.”
आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत काय..? आपण परकियांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असताना कधी हा विचार केला आहे का..? मला तर वाटते आपण आजही पारतंत्र्यातच आहोत पण ते स्वकीयांच्या.. एक वेळ इंग्रज परवडले पण आजचे राज्यकर्ते नकोत असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत आपण हतबुद्ध होवून बसलो आहोत म्हणजे आपण नक्की पारतंत्र्यातच आहोत. आम्हाला आमचे स्वतंत्र विचार नाहीत.. आम्ही बोलतो ती भाषा परक्यांची..आम्ही घालतो ते वेष परक्यांचे.. आम्ही पाहतो ते चित्रपट विदेशी..आम्ही खातो खाद्य चायनीज..आम्ही घेतो ते उपचार अॅलोपॅथिक..नेमकं झालंय तरी काय आम्हाला आज..? की उच्चार आणि आचाराप्रमाणे विचारांच्या बाबतीतही आम्ही पुरते पारतंत्र्यातच आहोत..?
आजघडीला देशाची वैचारिक, बौद्धिक, मानसिक, धार्मिक,  राजकीय, सामाजिक, आर्थिक, व आंतरराष्ट्रीय परिस्थिती उघड्या डोळ्यांनी बघितली तर असं वाटतं की आम्हाला डोळे असून दृष्टी  नाही.. कान असले तरी काळाची हाक ऐकू येत नाही..जीभ असून वाचा बंद पडली आहे..आणि हातपाय असूनही आमची पंगुवत अवस्था झाली आहे. आज ६६ वर्षे झाली तरी स्वातंत्र्य हा पदार्थ नेमका कशासोबत खातात हे अजून आम्हाला नीट उमगले आहे असे वाटत नाही. हीच गोष्ट भारत सोडताना ब्रिटीशांचा व्हाइसराय पंचम जॉर्ज आपल्या निवेदनात ठळकपणे अधोरेखित केली होती. “आम्ही भारताला स्वातंत्र्य देत आहोत परंतु स्वातंत्र्य उपभोगायला भारत समर्थ आहे असे आम्हास वाटत नाही. तेंव्हा स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यावा हे शिकण्यासाठी तरी त्यास आमच्यावरच विसंबून राहावे लागेल ”, असे तो म्हणाला होता. त्याचे म्हणणे खरेही होते म्हणा..!!
कारण स्वतंत्र भारताची राज्यघटना तरी कुठे पुरती स्वतंत्र होती..?नाही तरी चार घरी जोगवा मागून त्या पिठाची भाकरी मळावी आणि ती  एक नवीन पाककृती आहे असे सांगत तिच्या निर्मितीचे अख्खे श्रेय लाटावे तशी भारतीय राज्यघटना लाटून तिच्यावर स्वतःची भाकरी भाजून घेणारे शिल्पकार भारतातच सापडायचे..!! आता वरचे कव्हर तेवढे आपले व  आत कायदेच जर त्यांचे असतील तर ते आंमलात आणायची अक्कलही आम्हा बापड्या भारतीयांत कोठून असावयाची..? तिथेच सारे नडत आले. मग शतकानुशतके फक्त मोगल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटीश, इत्यादींमुळे जडलेल्या पारतंत्र्याच्या जुनाट व बळावलेल्या अजारावर उपचारापोटी दिलेली स्वातंत्र्याची मात्रा तरी आमच्या प्रकृतीस एकदम कशी मानवणार ? रोग बरा होण्यासाठी आधी औषध लागू पडावे लागते, नसता औषधाचीच रिअॅक्शन येते.. 
आज आम्ही उपभोगीत असणारे स्वातंत्र्य हे अशीच एकप्रकारची रिअॅक्शन असली पाहिजे..!! स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक विचार मनास चटकन शिवून गेला , की आपण आज खरोखरच स्वतंत्र आहोत काय..? आणि दुसाऱ्या क्षणी मनाने ताबडतोप उत्तर दिलं,  “बा भारतीया, तू इंग्रजांच्या भौतिक स्वातंत्र्यातून स्वतंत्र झाला असशीलही पण आजही त्यांच्याच वैचारिक पारतंत्र्यात वावरतो आहेस.यात तुझी चूक मुळीच नाही. आज तुला ता गोष्टीचा फारच पश्चात्ताप वाटत असेल तर हा विषमज्वरही तुला फार उशिरा आल्यामुळे त्याचा काही एक उपयोग नाही.